इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार? 5 पॉइंटमध्ये समजून घ्या आव्हान

इराण आणि इस्रायलमध्ये सुरु झालेल्या युद्धाचा फक्त त्या दोन देशांवरच नाही, जगावर व्यापक परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून शेअर बाजारामध्ये त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. भारतही याला अपवाद नाही. भारतावरही या युद्धाचे परिणाम होणार. त्यामुळे हे युद्ध जास्त न वाढण्यातच सगळ्यांचा फायदा आहे. मागच्या दोन दिवसात दोन्ही देशांनी परस्परांवर प्रचंड मोठे हल्ले केले आहेत. त्यात इराणच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा जास्त आहे.

Jun 16, 2025 - 12:01
 0  0
इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार? 5 पॉइंटमध्ये समजून घ्या आव्हान

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरु झालं आहे. या युद्धाची सुरुवात इस्रायलच्या बाजूने झाली आहे. इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमापासून आमच्या अस्तित्वाला धोका आहे, असं सांगत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्यूह यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरु केलं. इस्रायलकडून गुरुवार रात्रीपासून इराणमधील अणवस्त्र तळ, त्यांचे बॅलेस्टिक मिसाइल्सच उत्पादन करणारे कारखाने, सैन्य ठिकाणं आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांना संपवण्याच मिशन सुरु झालं. इराणने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ट्रू प्रॉमिस 3’ म्हणून ऑपरेशन सुरु केलय. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरु आहेत. मिसाइल्सचा पाऊस पाडला जातोय. या युद्धात आतापर्यंत अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा जास्त आहे. मध्य पूर्वेमध्ये सुरु झालेल्या या युद्धाचा परिणाम फक्त दोन देशांवरच नाही, तर त्याचा व्यापक परिणाम सगळ्या जगावर होणार आहे.

1941-42 पासून इराणमध्ये मोहम्मद रजा पहलवी यांचं शासन होतं. पण इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. सत्तापालट झाला. अयातोल्लाह खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये मोठा उठाव होऊन ही क्रांती झाली. मोहम्मद रजा पहलवी यांना इराण सोडावं लागलं. त्यानंतर जागतिक राजकारणातील बरीच समीकरण बदलली. पहलवी यांच्या शासनकाळात इराणचे अमेरिका, इस्रायल बरोबर उत्तम संबंध होते. पण अयातोल्लाह खोमेनी सत्तेवर येताच या दोन्ही देशांच इराण बरोबर शत्रुत्व निर्माण झालं. आज अयातोल्लाह खोमेनी इराणचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. आज इस्रायल-इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाची मूळं त्या इस्लामिक क्रांतीमध्ये दडलेली आहेत.

1979 नंतर इराणमध्ये वेगवेगळे पंतप्रधान झाले, मंत्री बदलले पण सर्वोच्च सत्ताकेंद्र अयातोल्लाह खोमेनीच आहेत. इराणमध्ये इस्लामिक राजवट आहे. तिथे महिलांना फारसे अधिकार नाहीत. मध्यंतरी त्यावरुन इराणमध्ये मोठा उठाव झाला होता. आता इस्रायलने इराणवर हल्ला करताना त्यांना अणवस्त्र विकसित करण्यापासून रोखणं हे कारण दिलं असलं, तरी इराणमध्ये सत्ताबदल हा सुद्धा इस्रायल-अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेच एक धोरण आहे, त्यांना जगातल्या कुठल्याही देशात त्यांच्या मर्जीचा शासक हवा असतो. तो नसेल, तर अमेरिका त्या देशाला सुखाने राहू देत नाही. इराणही याला अपवाद नाही. अमेरिकेला मध्यपूर्वेमध्ये विशेष रस असण्याच कारण म्हणजे तेल. सौदी अरेबिया, कतर, संयुक्त अरब अमिराती, इराक हे तेल संपन्न देश आहेत. आज या ठिकाणी अमेरिकेच वर्चस्व मान्य करणारे शासक आहेत. फक्त इराणमध्ये अमेरिका विरोधी सत्ता आहे.

इराणची कुठली गोष्ट खुपते?

त्यामुळे अमेरिकेला ही गोष्ट अनेक दशकांपासून खुपत आहे. अमेरिकेने मागच्या अनेक वर्षात शक्य त्या सर्व मार्गांनी इराणला त्रास देण्याचा, त्यांची प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी सुद्धा ठरले. इराणमध्ये अमेरिकेच्या मनासारखा शासक नाहीय. म्हणून मागच्या साडेचार दशकापासून अमेरिकेने त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले. त्यांची आर्थिक आणि लष्करी आघाडीवर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेची नजर इराणच्या तेलावर आहे. या सगळ्या आव्हानांवर, परिस्थितीशी सामना करत अयातोल्लाह खोमेनीच शासन टिकून आहे.

इराणमध्ये इस्रायलला जखमी करण्याती ताकद

वेगवेगळ्या प्रकारच्या निर्बंधांमुळे इराणकडे अनेक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाहीय. आज त्यांची अमेरिका आणि इस्रायल इतकी लष्करी ताकद नाहीय. पण त्याही पस्थितीत इस्रायलला जखमी करण्याइतपत मिसाइल आणि ड्रोन तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलय. युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच टीव्हीवरच्या दृश्यांमधून ते आपण पाहिलं. इराणची अनेक मिसाइल्स इस्रायलच अभेद्य हवाई सुरक्षा कवच भेदून इस्रायलच्या शहरांपर्यंत पोहोचली. इस्रायलची राजधानी तेल अवीवसह हायफा आणि अन्य शहरांमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, आज इस्रायलकडे F-16, F-22, F-35 सारखे अत्याधुनिक फायटर जेट्स आहेत. आज इराणकडे त्या ताकदीची फायटर विमानच नाहीयत. पण इस्रायलच नुकसान करण्याइतपत ताकद नक्कीच आहे.

सगळे मुस्लिम देश इराणसोबत का नाहीत?

आज जगात आर्थिक दृष्टया संपन्न असलेले असे काही मुस्लिम देश आहेत, ज्यांना मुस्लिम वर्ल्डच नेतृत्व करायचं आहे. यात सौदी अरेबिया, कतर, तुर्की आणि इराण या चार देशांची नाव प्रामुख्याने घ्यावी लागतील. यात पुन्हा शिया-सुन्नी असा वाद आहे. इराण एक शिया बहुल मुस्लिम देश आहे. त्यामुळेच इस्रायल विरुद्धच्या या युद्धात अन्य मुस्लिम देश जाहीरपणे इराणची मदत करत नाहीयत. उलट इराणच्या बाजूला असलेला जॉर्डन हा मुस्लिम देश इस्रायलला साथ देतोय. अयातोल्लाह खोमेनी यांना मुस्लिम जगाच नेतृत्व करण्याची महत्वकांक्षा आहे. त्यामुळेच इराणकडून नेहमी अमेरिका-इस्रायल विरोधात आक्रमक भाषा केली जाते. इस्रायल मध्य पूर्वेतील एक छोटसा देश आहे. त्यांच्या सर्व सीमा मुस्लिम देशांना लागून आहेत. इस्रायलच अस्तित्व स्थापनेपासूनच या मुस्लिम देशांना खुपत आलं. म्हणून या मुस्लिम देशांनी इस्रायलबरोबर अनेक युद्ध लढली. त्यांना वाटलं आपण इस्रायलला सहज संपवू. पण इस्रायल या देशांना पुरुन उरला. एकाचवेळी चार-चार, पाच-पाच देशांना इस्रायलने लोळवलं. इस्रायलची हीच ताकद इराणला खुपते.

इस्रायलने पद्धतशीरपणे एकेकाचा कार्यक्रम सुरु केला, कारण….

इस्रायलला त्रास देण्यासाठी त्यांच्या सभोवताली इराणने पॅलेस्टाइनमध्ये हमास, लेबनॉनमध्ये हिजबोल्लाह, येमेनमध्ये हुथी आणि सीरियामध्ये दहशतवादी संघटनांच जाळ उभारलं. इराण थेट इस्रायल विरोधात लढत नव्हता. या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून इस्रायलला त्रास देण्याच काम सुरु होतं. 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये जो नरसंहार केला, त्यानंतर सगळ चित्रच बदललं. इस्रायलने पद्धतशीरपणे एककाचा कार्यक्रम सुरु केला. आधी त्यांनी हमासची ताकद कमी केली. त्यानंतर लेबनॉनध्ये हिजबोल्लाह विरोधात ऑपरेशन सुरु केलं. त्याच्या प्रमुखासह अनेक दहशतवादी मारले. त्यांचे रॉकेट, क्षेपणास्त्राचा साठा संपवला. आता इस्रायलच टार्गेट इराण आहे. कारण इराणला शक्ती कमी केली नाही, तर भविष्यात आपल्या अस्तित्वाला धोका आहे, हे इस्रायलला माहिती आहे. इराणचे अनेक वर्षांपासून अणूबॉम्ब विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इस्रायलने वेळोवेळी कधी सायबर हल्ल्याने तर कधी त्यांच्या शास्त्रज्ञांची हत्या करुन त्यांच्या कार्यक्रमाला खीळ घातली, वेग कमी केला. पण आता एका रिपोर्टनुसार इराणने 60 टक्के शुद्ध युरेनियमच संवर्धन केलं होतं. अणूबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अजून 20 ते 30 टक्के शुद्ध युरेनियमच संवर्धन त्यांनी केलं, तर ते नऊ अणूबॉम्ब बनवू शकत होते, म्हणून त्यांच्यावर हल्ला केल्याच इस्रायलने सांगितलं.

इराण-इस्रायल युद्धाचे भारतावर होणारे पाच परिणाम

भारतावर पहिला परिणाम

इराण-इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा तात्काळ परिणाम म्हणजे हवाई प्रवास महागणार. एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, सध्या भारतासाठी पाकिस्तानचा एअरस्पेस बंद आहे. आता इस्रायल-इराण युद्धामुळे त्या दोन्ही देशांचा सुद्धा एअरस्पेस बंद झाला आहे. त्यामुळे भारताची जी कुठली विमानं अमेरिका, युरोप आणि कॅनडासाठी जातील, त्यांना वळसा घालून जावं लागेल. त्यामुळे इंधन जास्त खर्च होईल. अंतर वाढल्याने परिणाम हवाई तिकीटाचा खर्च वाढणार, प्रवासाचा वेळ वाढणार. यात दुहेरी नुकसान आहे.

दुसरा परिणाम

इराण-इस्रायल युद्धाचा दुसरा परिणाम तेलाच्या दरावर झालाय. दोन दिवसात क्रूड ऑइलच्या किंमती 15 टक्क्याने वाढल्या आहेत. जाणकारांनुसार इराण-इस्रायल युद्ध असर सुरु राहिलं, तर कच्चा तेलाच्या किंमती आणखी 8 ते 9 टक्क्याने वाढतील. याचा थेट परिणाम भारतात महागाई वाढण्यात होईल. तूर्तास हा परिणाम जाणवणार नाही. पण युद्ध अधिक खेचल्यास महागाईवर परिणाम दिसून येईल.

तिसरा परिणाम

इराण त्यांच्या उत्तरेला असलेला होर्मुज जलडमरूमध्य बंद करण्याचा विचार करत आहे. हा जलमार्ग सगळ्या जगासाठी महत्त्वाचा आहे. फारसच्या खाडीत प्रवेश करण्यासाठी होर्मुज जलडमरू एकमेव मार्ग आहे. जगातील तेलाचा 20 टक्के व्यापार या मार्गावरुन चालतो. युद्धामुळे या मार्गात कोणती बाधा आली, तर इराक, यूएई आणि सौदी अरेबियावरुन येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा येईल. अशा स्थितीत भारतासाठी आयात करणं कठीण होईल. असं झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील.

चौथा परिणाम

जाणकारांनुसार, इराण-इस्रायल युद्ध लवकर थांबलं नाही तर अशा स्थितीत डॉलरची मागणी वाढेल. कारण डॉलरला जास्त सुरक्षित मानलं जातं. अशा स्थितीत भारताच्या रुपयावरील दबाव वाढेल. रुपयावरील दबाव वाढल्यास देशाच्या ट्रेड डिफिसीट आणि करंट अकाऊंट डिफिसिटवर परिणाम दिसून येईल. रुपयाच मूल्य कमी झाल्यास आयात वस्तूंचे दर वाढतील.

पाचवा परिणाम

भारतातून जवळपास 1 कोटी लोक खाडी देशात नोकरी करतायत. मागच्यावर्षी याच लोकांनी त्यांच्या कमाईतून 45 अब्ज डॉलर भारतात पाठवले. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्याचा फायदा झाला. युद्ध भीषण झाल्यास या लोकांच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. काही प्रमाणात त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0