16 जून ‘श्री श्री रविशंकर शांती, आरोग्य दिन’ म्हणून होणार साजरा; ऐतिहासिक घोषणा
जॅक्सनव्हिलच्या महापौरांनी उत्तर फ्लोरिडा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात ऐतिहासिक घोषणा केली. आता 16 जून हा दिवस 'श्री श्री रविशंकर शांती आणि आरोग्य दिन' म्हणून साजरा करण्यात येईल.

फ्लोरिडाच्या जॅक्सनव्हिल इथं 16 जून हा दिवस अधिकृतपणे ‘श्री श्री रविशंकर शांती आणि आरोग्य दिन’ म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा करण्यात आली. जागतिक शांती, मानसिक आरोग्य आणि मानवतेच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. जॅक्सनव्हिलच्या महापौरांनी उत्तर फ्लोरिडा विद्यापीठात आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान याची औपचारिक घोषणा केली. यावेळी श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ (AOL) संस्थेच्या कामाचं विशेष कौतुक करण्यात आलं. या संस्थेनं जगभरात तणावमुक्त समाज निर्माण करण्यासाठी योग, ध्यान आणि सामुदायिक सेवेद्वारे जागरुकता पसरवली आहे.
जॅक्सनव्हिल हे केवळ अमेरिकेतच नव्हे तर ‘श्री श्री रविशंकर दिन’ घोषित करणारं जगातील 32 वं शहर बनलं आहे. या निर्णयामुळे श्री श्री रविशंकर यांची जागतिक स्तरावर वाढती प्रतिष्ठा आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चळवळीचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. हा दिवस आता दरवर्षी जॅक्सनव्हिलमध्ये शांतता, आरोग्य आणि सामुदायिक उन्नतीसाठी समर्पित दिवस म्हणून साजरा केला जाईल. ज्यामुळे स्थानिक नागरिकांना सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरणा मिळेल.
13 मे रोजी जन्मलेले श्री श्री रविशंकर हे जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आहेत. 1970 च्या दशकाच्या मध्यापासून त्यांनी ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे संस्थापक महर्षी महेश योगी यांच्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनची स्थापना केली. बंगळुरूमध्ये त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचं मोठं आश्रम आहे. याठिकाणी जगभरातील लोक सेवेसाठी किंवा ध्यानसाधनेच्या विविध कोर्सेससाठी येतात. अध्यात्म हे कोणत्याही एका धर्मापुरतं किंवा संस्कृतीपुरतं मर्यादित नाही. तर ते सर्वांसाठी खुलं आहे, असं त्यांचं मत आहे. रविशंकर यांनी तणावमुक्त आणि हिंसाचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अभूतपूर्व जागतिक चळवळीचं नेतृत्व केलं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध कार्यक्रम आणि कोर्सेसद्वारे ते आजपर्यंत अंदाजे 450 दलशक्ष लोकांपर्यंत पोहोचले आहेत.
What's Your Reaction?






