भयंकर! 50 हत्ती कापले जाणार, मांस घराघरात वाटणार; फर्मान सुटलं, कारण अत्यंत हृदयद्रावक

जगात वन्यजीव वाचवण्याची मोहिम सुरू असताना 50 हत्ती मारण्याचा आदेश एका देशाने दिला आहे. त्यांचे मास स्थानिक समुदायांना वाटणार असल्याचेही त्यात म्हटले गेले आहे.

Jun 13, 2025 - 17:02
Jun 14, 2025 - 15:29
 0  2
भयंकर! 50 हत्ती कापले जाणार, मांस घराघरात वाटणार; फर्मान सुटलं, कारण अत्यंत हृदयद्रावक

एकीकडे जगात वन्यजीव वाचवण्यासाठी मोहिम कार्यरत आहे. तर, एक असा देश आहे. जिथे 50 हत्तींना मारण्याचा आदेश दिला आहे. या हत्तींना मारल्यानंतर त्यांचे मास हे स्थानिक समुदायांमध्ये वाटले जाणार आहे. तर हत्तीचे दात हे सरकारला सुपूर्द केले जाणार आहे. अशा आदेशाचे कारण काय? हा देश कोणता?

या देशाचे नाव आहे झिम्बाब्वे, जिथे जवळपास ५० हत्तींना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण तेथे हत्तींची संख्या खूप जास्त वाढली आहे. त्यामुळे परिसंस्थेवर दबाव येत आहे. वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होईल. मारलेल्या हत्तींचे मांस स्थानिक लोकांमध्ये वाटले जाईल आणि हत्तीचे दात सरकारला दिले जातील.झिम्बाब्वेतील सेव व्हॅली कंजर्वेंसीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसंस्थेचे संरक्षण होईल, असा विश्वास आहे.

झिम्बाब्वे पार्क आणि वन्यजीव व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या राखीव क्षेत्रात सुमारे २,५५० हत्ती आहेत. पण या क्षेत्राची क्षमता फक्त ८०० हत्तींची आहे. "हा निर्णय परिसंस्थेचे आणि आसपासच्या समुदायांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे," असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

हस्तीदंत सरकार का ठेवणार?
हत्तींना मारल्यानंतर त्यांचे दात सरकारला सोपवले जातील. जगभरात हत्तीच्या दातांच्या व्यापारावर बंदी आहे. त्यामुळे झिम्बाब्वेला त्यांचे हत्ती दात विकण्याची परवानगी नाही. गेल्या पाच वर्षांपासून येथील अधिकारी हत्तींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी २०० हत्तींना दुसऱ्या अभयारण्यात पाठवले, पण ते पुरेसे ठरले नाही.

सर्वाधिक हत्तींच्या देशांपैकी एक
बोत्सवानानंतर झिम्बाब्वे हा जगातील हत्तींच्या लोकसंख्येचा दुसरा सर्वात मोठा देश आहे. हवामानातील बदलामुळे आणि दुष्काळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात हत्ती मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षात दुसऱ्यांदा हत्तींना मारण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्यावर्षी 200 हत्तींची हत्या
२०२४ मध्ये झिम्बाब्वेमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी २०० हत्तींना मारण्याची परवानगी देण्यात आली होती. १९८८ नंतर पहिल्यांदाच असे घडले होते.वन्यजीव आणि पर्यटन क्षेत्रातील लोकांचे म्हणणे आहे की, हत्तींना मारल्याने देशाची प्रतिमा मलिन होऊ शकते. तसेच वन्यजीव संरक्षणाच्या प्रयत्नांनाही यामुळे बाधा येऊ शकते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0