तुमच्या सत्तेच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवर राज ठाकरेंचा संताप
पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत. राज ठाकरे यांनी या दुर्घटनेवरून सरकारवर टीका केली आहे आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 51 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणताही पर्यटक बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही. पण तरीही खबरदारी म्हणून आज सकाळपासूनच पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आता या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला सुनावले आहे.
राज ठाकरे यांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी कुंडमळ्यातील तुटलेल्या पुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग?
पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.
आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं, असे राज ठाकरेंनी म्हटले.
What's Your Reaction?






