महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा; हजारो नागरिक उतरले रस्त्यावर - NANDINI MAHADEVI ELEPHANT KOLHAPUR

कोल्हापूर : जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारा इथं पाठवल्यामुळं ग्रामस्थांसह कोल्हापुरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळं कोल्हापूरसह परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संघटनांनी महादेवी हत्तीणला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. या पार्श्वभूमीवर श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढली आहे. यामध्ये जिल्ह्यासह आणि इतर राज्यांतील सर्वधर्मीय या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.
पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी : पदयात्रेला रविवारी पहाटे नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली-कोल्हापूर महामार्गानं शिरोली फाटा, पुणे-बेंगळूरु महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर इथं पोहचणार आहे. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. 'एक रविवार माधुरीसाठी' असं म्हणत नागरिक मोठ्या संख्येनं या मूक पदयात्रेत सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन महादेवी हत्तीण परत आणण्याची मागणी नागरिक करणार आहेत.
What's Your Reaction?






