केदारनाथ दुर्घटना: हेलिकॉप्टर कोसळून जयस्वाल कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत – एकाच कुटुंबावर काळाचा घाला

Jun 15, 2025 - 11:51
Jun 15, 2025 - 11:53
 0  3
केदारनाथ दुर्घटना: हेलिकॉप्टर कोसळून जयस्वाल कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत – एकाच कुटुंबावर काळाचा घाला

रुद्रप्रयाग | यवतमाळ – उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात आज पहाटेच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात वणी (जि. यवतमाळ) येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा, म्हणजेच पती-पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

मृतांची नावे:

  • राजकुमार जयस्वाल (वय 42)

  • श्रद्धा जयस्वाल (वय 34)

  • काशी जयस्वाल (वय 2)

चारधाम यात्रेसाठी गेलेल्या या कुटुंबाचे स्वप्न अपूर्णच राहिले. काशीच्या जन्मानंतर तिला 'काशी' नगरीचे दर्शन घडवण्याची इच्छा ठेवणाऱ्या या कुटुंबाचे स्वप्न या अपघाताने अक्षरशः चुरगाळले.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे आर्यन एविएशन कंपनीचे असून ते गौरीकुंड ते केदारनाथ मार्गावर होते. खराब हवामान आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. पायलट कॅप्टन राजबीरसिंग चौहान यांच्यासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने वणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जयस्वाल कुटुंबाची सामाजिक ओळख:
राजकुमार जयस्वाल हे ‘राजा’ या नावाने प्रसिद्ध होते. सामाजिक व धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग असायचा. अलिकडेच त्यांनी वणी येथे शिवमहापुराणाचे आयोजन केले होते. ते शिवभक्त होते आणि त्यांच्या मुलीला त्यांनी 'काशी' हेच नाव दिले होते.

दुर्दैवाने, या संकल्पपूर्तीसाठी निघालेल्या प्रवासाचा असा अंत झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मुलगा विवान हा आजोबांकडे पांढरकवड्याला असल्यामुळे अपघातात वाचला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0