कुंडमळा पूल दुर्घटना नेमकी कशामुळे झाली? खरं कारण आलं समोर

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा जास्त जखमी झाले. स्थानिक गणेश पवार यांनी सांगितले की, पुलावर गर्दी आणि दुचाकींचा वाद यामुळे पूल कोसळला. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. बचावकार्य सुरू असून, सरकारने मदत जाहीर केली आहे.

Jun 16, 2025 - 12:42
 0  0
कुंडमळा पूल दुर्घटना नेमकी कशामुळे झाली? खरं कारण आलं समोर

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक पर्यटक जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि पोलीस दलाच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेनंतर ही घटना नेमकी कशी आणि कशामुळे घडली, याचे कारण समोर आले आहे.

इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून मोठी दुर्घटना झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच नुकतंच कुंडमळ्यातील स्थानिक गणेश पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी ही दुर्घटना कशामुळे घडली, याबद्दलची सविस्तर माहिती दिली.

गणेश पवार काय म्हणाले?

“मी कुंडमळ्यावर राहतो. तिथला स्थानिक आहे. नदीच्या अलीकडे दोन पाहुण्यांना सोडण्यासाठी मी आलो होतो. मी त्यांना सोडून परत चाललो होतो. त्यावेळी अनेक पर्यटक हे त्या पुलावर उभे होते. त्यावेळी दोन्ही बाजूने दुचाकी आल्या, त्या पुलावरुन एकावेळी दोन दुचाकी जात नाहीत. तेव्हा त्याठिकाणी पर्यटकांची संख्याही जास्त होती. पर्यटकांना पुढे सरकताही येत नव्हते. त्यानंतर हा पूल पडला”, असे गणेश पवार म्हणाले.

“शनिवार-रविवार या दोन्ही वेळेला जास्त गर्दी असते. यावेळी त्या दोन दुचाकी स्वारांमध्ये थोडा वाद झाला. हा पूल हलत होता. आम्हाला स्थानिकांना पाण्याच्या प्रवाहाबद्दल माहिती आहे. मी देखील तो पूल पडला तेव्हा पडलो होतो. पण तेव्हा मी पलीकडे न जाता अलीकडे आलो आणि त्यामुळे माझा जीव वाचला. सध्या माझी दुचाकी आत आहे. अद्याप काढलेली नाही. प्रशासन काय म्हणतंय ते पाहून दुचाकी काढण्याचा निर्णय घेणार आहे. कारण अद्याप खाली उतरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मी लोखंडी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली, त्यानंतर 3-4 पर्यटकांना ही बाहेर काढलं”, असेही गणेश पवार यांनी सांगितले.

पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाण्याचा वेग आणि प्रतिकूल हवामान यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ कुंडमळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंडमळा पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, या दुर्घटनेतील जखमींच्या उपचारांचा खर्चही शासनातर्फे केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0