पुण्यात मोठा सायबर कांड, कोट्यवधी लाटण्यासाठी रचायचा मोठा कट; बिंग फुटताच…
सध्या पुण्यातील एका सायबर क्राईमचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत भामट्याने कोट्यवधीची फसवणूक केली आहे.

देशभरात सायबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे फसवणुकीची पद्धतही दिवसेंदिवस बदलत आहे. दरम्यान, पुण्यातील सायबर क्राईमचे असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपीची पत्नी एका राजकीय पक्षाशी निगडीत आहे. या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात एकूण 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असे या सायबर भामट्याचे नाव आहे. तो मूळचा रायगडचा आहे. त्याने मनी लाँड्रिग व्यवहारात डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर सायबर चोरट्याला पोलिसांनी पनवेल परिसरातून अटक केली होती. त्याला सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्याने आतापर्यंत एकूण पाच जणांची फसवणूक केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकता असून ती गावाची सरपंचदेखील आहे.
नेमकी फसवणूक कशी करायची?
वाजंत्रीने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली होती. मनी लाँड्रिंप्रकरणी कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान फसवणूक झालेल्या जेष्ठ व्यक्तीने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी 29 लाख रुपये जमा केले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केली. त्यानंतर सायबर पोलिसांना ज्येष्ठ नागरिकाने पाठवलेली रक्कम वाजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले.
लाटलेले पैसे बँकेत ठेवले
सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी त्याने त्यातील 90 लाख आणि 20 लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. ज्या खात्यात हे पैसे ठेवण्यात आले होते, ते बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहचले. पण राजकीय संबंध असलेल्या वाजंत्री याला पोलिसांची चाहूल लगेच लागली. पोलीस येत आहेत हे कळताच तो तिथून फरार झाला.
फसवणुकीचे धागे केरळपर्यंत
पुढे पोलिसांना तुषार वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती एका खबऱ्याने दिली. त्यातूनच पुणे पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सायबर चोरीच्या गुन्ह्यामध्ये केरळ पोलीससुद्धा या वाजंत्रीच्या मागावर होते. पुणे पोलिसांनी केरळ पोलिसांची संपर्क साधला आहे. या वाजंत्रीच्या विरोधात नॅशनल सायबर पोर्टलवर वेगवेगळ्या राज्यातून पाच तक्रारी दाखल आहेत.
What's Your Reaction?






